एम.जे. अकबर यांच्यावर बलात्काराचा आरोप, बचावात समोर आलेली पत्नी म्हणाली- सर्व दोघांच्या संमतीने

Foto

नवी दिल्ली – लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे मंत्रिपद गमावलेले एम.जे. अकबर यांच्यावर पुन्हा एका महिला पत्रकाराने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. वास्तविक अकबर यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेत अकबर यांनी दावा केला की त्या महिला पत्रकाराच्या संमतीनेच तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते. या संबंधांमुळे माझ्या कुटुंबांतही वाद झाले होते. विशेष म्हणजे, एम.जे. अकबर यांची पत्नी मल्लिका अकबर या प्रथमच पतीच्या बचावात समोर आल्या आहे. त्यांनी पतीवर झालेले आरोप फेटाळले आहे.

 

अकबर यांच्यावर आता बलात्काराचा आरोप

सध्या अमेरिकेत स्थायिक असलेल्या पत्रकार पल्लवी गोगोई यांनी एम.जे. अकबर यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे.  वॉशिंग्टन पोस्टमध्ये लिहिलेल्या लेखात गोगोई यांनी हे आरोप केले आहेत. पल्लवी गोगोई आणि अकबर हे एकत्र काम करत होते, त्या काळात त्यांच्यावर बलात्कार झाल्याचे गोगोई यांनी लेखात म्हटले आहे. हे आरोप अकबर यांनी फेटाळले आहेत. त्यांचा दावा आहे की पल्लवी गोगोईंच्या संमतीने हे संबंध ठेवण्यात आले होते.

काय म्हणाल्या अकबर यांच्या पत्नी

एम.जे. अकबर यांच्याविरोधात मी टू मोहिम सुरु झाल्यानंतर अनेक महिला पत्रकारांनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले. मात्र त्यांची पत्नी मल्लिका या शुक्रवारी प्रथमच माध्यमांसमोर आल्या आहेत. त्या म्हणाल्या, माझे पती एम.जे. अकबर यांच्याविरोधात सुरु झालेल्या मी टू मोहिमेवर मी आतापर्यंत चूप होते. मात्र जेव्हा वॉशिंग्टन पोस्टमध्ये पल्लवी गोगोईंचा तो लेख छापून आला आणि माझ्या पतीवर बलात्काराचा आरोप करण्यात आला, तेव्हा मला त्या कटु सत्यासह समोर यावेच लागले.

मल्लिका अकबर म्हणाल्या, साधारण २० वर्षांपूर्वी पल्लवी गोगोईमुळे आमच्या घरात भांडण आणि वाद सुरु झाले होते. माझे पती आणि पल्लवी यांच्यात उशिरा रात्रीपर्यंत फोनवर गप्पा रंगत होत्या. माझ्या उपस्थितीत सार्वजनिक ठिकाणी आणि आमच्या घरात त्यांची वाढती जवळीक मी पाहात होते. त्यांच्या या दिखाऊ नात्याने आमच्या कुटुंबाची शांतता, सौख्य नष्ट केले होते. मला ते सर्व पाहून अतिशय वाईट वाटत होते आणि दुःख होत होते. युवा पत्रकारांच्या उपस्थितीत आमच्या घरात एशियन एजच्या ज्या पार्ट्या होत होत्या, त्यापाहून मला खूप लाज वाटायची, माझ्या डोळ्यांंसमोर ते सर्व सुरु होते. ते दोघे एकमेकांच्या एवढे जवळ राहात आणि एकत्र नाचतांना मला पाहावे लागत होते. त्यांच्या या सर्व भानगडींवरुन आमच्यात भांडण होत होते. घरातील वाढती अशांतता आणि भांडणांमुळे त्यांनी कुटुंबाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. तुशिता पटेल आणि पल्लवी गोगोई दोघी आमच्या घरी नेहमी येत-जात होत्या, सोबत ड्रिंक्स आणि डिनर घेत होत्या. तेव्हा कधीही मी त्यांचे लैंगिक शोषणाने त्रस्त असे पीडित चेहेरे पाहिले नाही. पल्लवी आता खोटे का बोलत आहे, मला माहित नाही. पण ती जे बोलत आहे ते खोटं आहे.

मोदी सरकारमध्ये मंत्री राहिलेले प्रसिद्ध पत्रकार एम.जे. अकबर यांच्यावर २० पेक्षा जास्त महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यानंतर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.